मंगळवेढा / प्रतिनिधी
तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई व दोन मुलींचा पाय घसरुन बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी या गावात आज घडली आहे.
रेश्मा बगताज शेख (वय.35) , सुफीया बगताज शेख (वय.11), खुशबू बगताज शेख (वय.9) असे मयत झालेल्या मायलेकिंची नावे आहेत.घटनेची खबर आसलम नबीसो शेख यांनी मंगळवेढा पोलिसात दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तळसंगी गावाजवळ असलेल्या तलावामध्ये धुणे धुण्यासाठी रेश्मा बगताज शेख हिच्यासमवेत त्यांची मुलगी सुफीया व खुशबू या दोघीही तळ्यावर गेल्या.
त्यावेळी पाय घसरून तोल जावून रेश्मा बगताज शेख या पाण्यात पडल्या. तिला पोहता येत नसल्याने ती बुडू लागली. तिला वाचविण्यासाठी सुफीया व खुशबू हिने पाण्यात उडी घेतली पण त्यांनाही पोहता येत नसल्याने ती ही बुडू लागल्या.
गावातील नागरिकांनी उड्या टाकून तिघींना बाहेर काढले. या तिघींना पोहता येत नसल्यामुळे बुडून मृत्यू झाला आहे.
दरम्यान दोन महिन्यांपूर्वीच गावातीलच तीन लहान मुलांचा एका शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने तळसंगी गावावर शोककळा पसरली आहे.