मंगळवेढा / प्रतिनिधी
------------------------------------
मंगळवेढयाचा विकास झाला पाहिजे या एकाच मुद्यावर आपण परिचारकांना पाठिंबा दिल्याचा पुनरूच्चार रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
शहा म्हणाले, गेल्या 60 वर्षामध्ये शहा परिवार आणि मंगळवेढयाचे समाजकारण असं एक नातं जोडलं गेलं. या 60 वर्षाच्या काळामध्ये जनतेने आम्हाला भरभरून दिले आहे. आता कोणत्याही पदाची अपेक्षा राहिलेली नाही. पवारसाहेबांचा शब्द प्रमाण मानून आम्ही आजपर्यंत काम केले आहे. मात्र स्थानिक नेतृत्वाकडून म्हणावा तसा विकास झालेला नाही. मंगळवेढयातील अनेक स्थळे उपेक्षित आहेत. मंगळवेढयात बाहेरून 90 टक्के लोक येतात त्यासाठी मंगळवेढा हे पर्यटन स्थळ झाले पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. हे झाल्यास सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. मंगळवेढयातील अनेक स्थळांचा विकास होवून महाराष्ट्रभर मंगळवेढयाचे नाव होईल. विकासाच्या दिशेने काम होईल. म्हणून आपण परिचारकांना पाठिंबा दिला आहे.
दरम्यान,आमची कोणत्याही पदाबाबत अपेक्षा राहिलेली नाही. तसेच आमची कोणाशीच स्पर्धा नाही. फक्त इथुन पुढे विकासाचेच काम करणार असल्याचे राहुल शहा म्हणाले.